(जावली /अजिंक्य आढाव )– बरड ते मिरढे दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले असून रस्ता खडीमय झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी तरी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बरड ते मिरढे रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.