आपला जिल्हा

आंदरूड – जावली येथे खरीप हंगामपूर्व नियोजन सभा संपन्न ; शेतकऱ्यांना विविध योजनांचे मार्गदर्शन

(जावली/ अजिंक्य आढाव ): मौजे आंदरूड व जावली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण, मंडल कृषी अधिकारी बरड तसेच ग्रामपंचायत आंदरूड व जावली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ग्राम कृषी विकास आराखडा वाचन, खरीप हंगामपूर्व मोहीम व नियोजन सभा उत्साहात पार पडली. यावेळी दोन्ही गावांतील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर, उप कृषी अधिकारी संजय अभंग, मंडल कृषी अधिकारी स्वप्नील बनकर, कृषी सखी तसेच युवा शेतकरी सुजित बोराटे, राहुल निंबाळकर, नामदेव पोकळे व सचिन पडर यांनी विविध कृषी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यामध्ये खरीप हंगाम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी प्रकल्पासाठी शेतकरी निवड व माती नमुने संकलन, कांदा काढणीनंतरचे व्यवस्थापन व कांदा चाळ उभारणी, कांदा बिजोत्पादन, हुमणी नियंत्रण, प्रकाश सापळे, फेरोमन सापळे, पक्षी थांबे यांसह नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर, हिरवळीची खते, जीवाणू खतांचा वापर याबाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, माती परीक्षण अहवाल वितरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, वैयक्तिक शेततळे, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण योजना, ट्रॅक्टर व अवजारे, शेडनेट, पॅक हाऊस, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया, पीक विमा, शेतकरी विमा, धरणी माता बचाव अभियान तसेच एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश्य परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. रब्बी हंगामात २०० शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत २९ शेतकऱ्यांना लाभ, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत १२५ शेतकऱ्यांची नोंदणी, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत १४८ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ तसेच पीएम किसान योजनेतील अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना पात्र करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!