(जावली /अजिंक्य आढाव )महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने १ मे रोजी साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शासकीय कार्यक्रमात सौ. वैशालीताई कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभुराजजी देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. चोरमले यांनी सामाजिक, शैक्षणिक व महिलांच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. त्यांनी ग्रामीण भागात महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबवले असून, सामाजिक जाणीव जागृतीसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान मानला जातो. या सन्मानामुळे सौ. चोरमले यांच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, आगामी काळात त्या आणखी जोमाने समाजकार्यात योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन इतरांनीही समाजसेवेत पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.