(फलटण/ प्रतिनिधी) : आदिवासी समाजाचे महानायक, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आले. अन्याय, शोषण आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे बिरसा मुंडा यांचे कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
१५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलीहातू येथे जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी अल्पवयातच आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. ब्रिटिश राजवट, जमीनदार आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी उलगुलान (महाविद्रोह) उभारला. जल, जंगल आणि जमीन यांवरील आदिवासींचे हक्क अबाधित राहावेत यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला.
बिरसा मुंडा यांनी सामाजिक आणि धार्मिक जागृतीचेही कार्य केले. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी एकत्र आले आणि स्वाभिमान व हक्कांसाठी संघटित लढा उभारला.
ब्रिटिश सत्तेने त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. ९ जून १९०० रोजी अवघ्या २५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा आजही आदिवासी समाजासह संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहे.
स्मृतिदिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि आदिवासी हक्कांसाठीचा त्यांचा संघर्ष इतिहासात अजरामर राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.