आपला जिल्हा

जावली ग्रामपंचायत रासपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष; पुन्हा ‘९:०’ची रणनीती ठरणार..?

(जावली / अजिंक्य आढाव) – २२ फेब्रुवारीची मुदत संपताच जावलीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून आता सर्वांचे लक्ष राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) च्या भूमिकेकडे लागले आहे. आगामी राजकीय समीकरणांत रासप कोणती रणनीती आखणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही वाढली आहे.

सन 2015 च्या निवडणुकीत रासपने राजे गटाचा पराभव करत तब्बल ९:० अशी एकतर्फी आघाडी घेत राजकीय इतिहास घडवला होता. त्या विजयाने तालुक्यात नवे समीकरण निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा तसेच चित्र निर्माण होणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

स्थानिक पातळीवर बैठका, गाठीभेटी आणि अंतर्गत रणनीतीचे सत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य आघाड्या, उमेदवारीचे समीकरण आणि मतदारसंघातील बदलते राजकारण याचा सखोल अभ्यास करूनच पुढील पाऊल टाकले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, विरोधी गटही सक्रिय झाले असून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रासप पुन्हा ‘९:०’चा करिष्मा दाखवणार की नवे समीकरण उदयास येणार.? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!