(जावली/ प्रतिनिधी) – आगामी जावली ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, गावातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर जावलसिद्धनाथ ग्रामविकास आघाडीचे संस्थापक राजकुमार गोफणे यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार असून, पॅनलच्या माध्यमातून विकासाभिमुख नेतृत्व दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गोफणे म्हणाले की, गाावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या निवडणुकीत एकूण ३ वॉर्डांमधील ९ सदस्य पदे आणि थेट सरपंच पदासाठी १ उमेदवार, अशा एकूण १० जागांवर आमचे पॅनल निवडणूक लढवणार आहे.
पार्श्वभूमी आणि रणनीती: राजकुमार गोफणे यांनी यापूर्वी वॉर्ड क्रमांक ३ मधून निवडणूक लढवून आपला जनसंपर्क सिद्ध केला होता. आता मात्र केवळ एका वॉर्डपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण गावच्या विकासासाठी त्यांनी सक्षम उमेदवारांची फळी उभी केली आहे. गावातील प्रश्न, पिण्याचे पाणी, रस्ते आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून मतदारांचा विश्वास जिंकण्याचा त्यांचा मानस आहे.
“आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवार हे जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत. त्यामुळे जावलीकर जनता आम्हाला नक्कीच कौल देईल,” असा विश्वास गोफणे यांनी व्यक्त केला आहे.