(फलटण/ प्रतिनिधी )महाविद्यालयात शिक्षण व व्यक्तिमत्व विकासाचे संस्कार घेऊन विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर अनेक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. अनेक जण उच्च पदावर काम करून समाजाची सेवा करत असतात,त्यांच्या मनात महाविद्यालयाविषयीचा जिव्हाळा,प्रेम, स्नेह असतो, अशा विद्यार्थ्यांच्याकडे महाविद्यालयाने दुर्लक्ष न करता त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी ऋणानुबंध घट्ट करून महाविद्यालयाच्या विकासात त्यांचे योगदान व सहकार्य घेतले पाहिजे,असे प्रतिपादन माजी विध्यार्थी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व फ.ए.सोसायटीचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून, माजी विद्यार्थी आमदार.मा.दिपक चव्हाण, फ. ए.सोसायटीचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ वैद्य होते,तर उपस्थितीमध्ये प्राचार्य डॉ.पी.एच कदम,सातारा जिल्हा परिषद सदस्या मा.सौ.वैशाली कांबळे,प्रा.डॉ.बाळासाहेब कांबळे, माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार श्री.पांडुरंग जाधव,श्री.वसंत मुळीक इ.उपस्थित होते.
मुधोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयाची स्थापना रयतसेवक माननीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी १९५७ साली केली.आजमितिला महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांच्या वर भरेल एवढी आहे.सरसकट सदस्य नोंदणी झाल्यास ही एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी असेल.यातील काही काळाच्या पडद्याआड जरी गेले असले तरी त्यांचे महाविद्यालयाप्रती योगदान आहे.याची जाणीव ठेवूनच हे माजी विद्यार्थी मंडळ अखंडितपणे सुरू आहे. शिक्षण,ज्ञान व समाजाप्रती योगदान व सहकार्य देणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधास इथून पुढच्या काळात अधिक महत्त्व देऊन वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मा. श्रीमंत. संजीवराजे यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव, डॉ.संजय दीक्षित यांनी केले मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.पी.एच कदम यांनी केले.काही माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी महाविद्यालयातील प्राध्यापक -प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.एन.के रासकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.