महाराष्ट्र

जिंतीत मानवी संवेदनांचा विजय ; ४ वर्षांची जट अखेर काढली

(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील जिंती गावात एका ६० वर्षीय महिलेची केसांतील जटेतून मुक्तता करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या डोक्यावर केसांची मोठी जट तयार झाली होती.श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज तरडगाव शाळेच्या प्राचार्या संगिता काकडे, व एम.एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेचे डॉ. सुधीर कुंभार मदतीने त्यांच्या केसांची योग्य प्रकारे काळजी घेऊन जट काढण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड-१९च्या काळात सदर महिला गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या काळात उपचार सुरू असल्याने आणि आजारपणामुळे शरीर कमकुवत झाल्याने महिलेला सतत अशक्तपणा जाणवत होता. उपचारानंतर प्रकृती सुधारली असली तरी कोविडच्या काळात दवाखान्यात सुरुवातीला केस थोडे थोडे गुंतू लागले. काही दिवसांनी केसांमध्ये गाठी पडू लागल्या. महिन्यांमधून केसांची अवस्था अधिकच बिकट होत गेली आणि हळूहळू संपूर्ण केस जटेत बदलले. त्यामुळे डोक्यावर सतत खाज सुटणे, डोकेदुखी, अस्वस्थता, झोप न लागणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
याबाबत सौ.वेणूताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज तरडगाव शाळेच्या प्राचार्य.संगिता काकडे यांना माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेतला. या महिलेची समजूत काढण्यात आली. त्यानंतर योग्य काळजी घेत केसांना तेल लावून, स्वच्छ पाण्याने हळूहळू केस मऊ करून आणि आवश्यक तेथे केस कापून जट काढण्यात आली.

चार वर्षांपासून चाललेल्या या त्रासातून मुक्त झाल्यानंतर महिलेने मोठा दिलासा व्यक्त केला. “मनातील भीतीमुळे मी स्वतःचे नुकसान करून घेतले,” अशी भावना तिने व्यक्त केली. या घटनेमुळे आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील अशा घटनांबाबत नागरिकांनी वेळेत मार्गदर्शन घ्यावे, असे काकडे यांनी आवाहन केले आहे. कोणत्याही आजारानंतर स्वच्छता आणि आरोग्य राखणे अत्यंत गरजेचे असून गैरसमज व भीतीमुळे उपचार टाळू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

या घटनेने जिंती परिसरात चर्चेला उधाण आले. तसेच मानसिक भीतीमुळे अनेकजण स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे समाजाने अशा महिलांना समजून घेऊन योग्य मदत करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!