आपला जिल्हा
समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी..!

फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर (विडणी) येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे सर यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांनी देशाला काय दिले हे समजून घेणे आणि त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.”
घोरपडे यांनी पुढे बाबासाहेबांच्या औद्योगिक आणि आर्थिक धोरणांवर प्रकाश टाकताना सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिकीकरणाचा पुरस्कार करत त्यांनी Reserve Bank of India, Life Insurance Corporation of India यांसारख्या संस्थांच्या उभारणीची दिशा दिली. तसेच खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून देशाच्या आर्थिक विकासाला बळ दिले.
जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून Central Water Commission यांसारख्या संस्थांची पायाभरणी झाली. दामोदर व हिराकूड यांसारख्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, १९४८ साली केंद्रीय विद्युत प्राधिकरण स्थापनेच्या माध्यमातून देशाच्या ‘राष्ट्रीय विद्युत ग्रिड’चा पाया रचला गेला.
शेतकरी आणि कामगार वर्गासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचाही त्यांनी उल्लेख केला. १९३८ मध्ये खोतीप्रथेविरोधात २० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून अन्यायकारक प्रथा संपवण्याचा मार्ग मोकळा केला. पुढे जमीनदारी नष्ट करून “कसेल त्याची जमीन” ही संकल्पना रुजली. कुळ कायदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, तसेच Fertilizer Corporation of India सारख्या संस्थांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.


