आपला जिल्हा

‘अनित्य, अनात्म व दुःख समजल्याशिवाय जीवन समजत नाही’ ; पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या धम्मदेशनाने समतानगर परिसर भारावला

(फलटण /प्रतिनिधी) : समता नगर, विडणी येथे कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर धम्मदेसना कार्यक्रम अत्यंत श्रद्धामय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या प्रभावी धम्मदेशनाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला.

 कार्यक्रमादरम्यान  भंते करुणानंद महाथेरो यांनी समतानगर येथील बुद्ध विहारास भेट देऊन महामानवांना अभिवादन केले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौद्ध उपासक-उपासिका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मोहिते परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले तसेच भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, सद्‌धम्म आणि भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून भंतेजींनी धम्मदेशनास सुरुवात केली. “तथागत बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला असून बुद्धांचा धम्म हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे,” असे त्यांनी सांगितले.

भंते करुणानंद महाथेरो यांनी बुद्धांच्या “अनित्य, अनात्म आणि दुःख” या त्रिसूत्री सिद्धांताचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन करत जीवनाचे वास्तव समजावून सांगितले. “जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे. अहंकार, लोभ आणि द्वेष बाजूला ठेवून शील, सदाचार आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारणे हेच खरे जीवन आहे,” असे ते म्हणाले.

कालकथित सुमनताई मोहिते यांच्या धम्मनिष्ठ जीवनाचा उल्लेख करताना त्यांनी, “शारीरिक दुःख असतानाही बुद्धधम्मामुळे मानसिक आनंद मिळतो,” असे त्या नेहमी सांगत असत, अशी भावनिक आठवण व्यक्त केली. तसेच पटाचारा, किसा गौतमी, विशाखा यांसारख्या बौद्ध धम्मातील महामातांचे उदाहरण देत मानवी जीवनातील दुःख, परिवर्तनशीलता आणि मृत्यूचे वास्तव स्पष्ट केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा उल्लेख करताना भंतेजी म्हणाले, “बाबासाहेबांनी बुद्धधम्म स्वीकारून मानवमुक्तीचा मार्ग दिला. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि आचरण करणे ही प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे.” पश्चिम महाराष्ट्रात धम्मकार्य अधिक व्यापक करण्यासाठी कराड परिसरात प्रशिक्षण व साधना केंद्र उभारण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, केंद्रीय शिक्षिका अनुराधा सोनवणे, चंद्रकांत मोहिते, महावीर भालेराव, बाबासाहेब जगताप, विठ्ठल निकाळजे, रामचंद्र मोरे, बजरंग गायकवाड, अमोल काकडे, आनंद जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते भंते करुणानंद महाथेरो यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ, चिवर व धम्मदान देण्यात आले.

सुमनताई मोहिते यांच्या स्मरणार्थ लावलेल्या बोधिवृक्षाच्या प्रथम स्मृतिदिनी भंते करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते “बोधिवृक्ष पूजन व धम्मस्मरण विधी” पार पडला. उपस्थित उपासक-उपासिकांनी वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मेत्ताभावना व्यक्त केली. हा विधी कृतज्ञता, स्मरण आणि धम्मनिष्ठ जीवनाचा संदेश देणारा ठरला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!