(फलटण /प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. बारामतीमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी ते मुंबईहून निघाले होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या घटनेत विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्य सरकारने या घटनेनंतर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा आणि आज शाळा-कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
घड्याळाने पटवली शेवटची ओळख हा अपघात इतका भीषण होता की विमानाचा जळून कोळसा झाला. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या हातातील मनगटी घड्याळ (Wrist Watch), त्यांचा गॉगल आणि जॅकेटवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. ज्या ‘घड्याळ’ चिन्हासाठी त्यांनी राजकीय संघर्ष केला, त्याच घड्याळाने त्यांची शेवटची ओळख पटवून दिली, ही बाब सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.
तांत्रिक बिघाड आणि भीषण स्फोट
अजित पवार यांचे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे भरकटले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विमान धावपट्टीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात वेगाने आदळले. कोसळताच विमानाने भीषण पेट घेतला आणि काही क्षणांत त्याचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु आगीची तीव्रता इतकी मोठी होती की विमानातील कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.