ताज्या घडामोडी
आकड्यांपलीकडचा अर्थ: AIMIM विरुद्ध वंचित – दोन राजकीय वाटा

(फलटण / प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट केली आहे की राजकारण फक्त भावना किंवा घोषणांवर चालत नाही; ते गणित, समाजरचना आणि सत्तावाटपाच्या वास्तवावर चालतं. AIMIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात हे वास्तव अधिक ठळकपणे पुढे आलं आहे.
AIMIM च्या यशामागे त्यांचं विशिष्ट तुष्टीकरणाचं राजकारण आणि त्याची सातत्यपूर्ण मांडणी आहे. AIMIM ला तब्बल ९५ जागा मिळाल्या, हा आकडा केवळ निवडणूक यशाचा नाही, तर एका ठराविक राजकीय पद्धतीचा निदर्शक आहे. मुस्लिम समाजाचं सातत्याने, आक्रमकपणे आणि केंद्रित पद्धतीने प्रतिनिधित्व केलं, तर त्या राजकारणाला संख्यात्मक वाढ मिळते, हे या निकालांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
AIMIM ने आपला मतदार वर्ग स्पष्ट ठेवला आहे. त्यांचं राजकारण एकरेषीय आहे आणि त्यामुळेच त्यांना निवडणुकीत आकड्यांच्या पातळीवर यश मिळालं. मात्र याच ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. हे राजकारण समावेशक आहे की संकीर्ण? कारण बहुजन राजकारण जर केवळ एका घटकाभोवती फिरू लागलं, तर दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाऐवजी तात्कालिक सत्तालाभालाच प्राधान्य दिलं जातं. AIMIM चं यश आकड्यांमध्ये मोठं असलं, तरी त्याची मर्यादा ही त्याची सामाजिक चौकट आहे, हे दुर्लक्ष करता येत नाही.
दुसरीकडे, या निवडणुकांनी वंचित बहुजन आघाडीबाबत एक महत्त्वाचा राजकीय धडा दिला आहे. वंचितला सत्तेत वाटा मिळाला आहे आणि हे केवळ प्रतीकात्मक यश नसून व्यवहार्य राजकीय उपलब्धी आहे. विशेषतः २३ नवनिर्वाचित नगरसेवक ही संख्या वंचितसाठी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. या सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचं मनःपूर्वक अभिनंदन करायलाच हवं.
श्री. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते
मोबाईल नं. 9284658690



