आपला जिल्हा

पंचशील ध्वज ; धम्म, इतिहास आणि मानवमूल्यांचा संगम

(फलटण /प्रतिनिधी)आज 8 जानेवारी जागतिक बौध्द धम्म पंचशील ध्वज दिन त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!पंचशील ध्वज हा केवळ रंगांचा संगम नाही; तो भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्ममार्गाचा, शीलप्रधान जीवनाचा आणि मानवमूल्यांच्या सार्वत्रिकतेचा जिवंत प्रतीक आहे. जिथे हा ध्वज फडकतो, तिथे अहिंसा, करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समतेचा संदेश शब्दांवाचून पोहोचतो. पंचशील ध्वज म्हणजे अंधश्रद्धेचा नव्हे, तर विवेक, समजूत आणि आचरणशील नैतिकतेचा ध्वज आहे.

भगवान बुद्धांनी मानवाला बाह्य कर्मकांडांपासून मुक्त करून अंतःकरणाच्या शुद्धतेकडे नेले. त्या शुद्धतेचा पाया म्हणजे शील. पंचशील ही शीलाची मूलभूत रचना आहे. प्राणीहिंसा टाळणे, चोरी न करणे, असंयम टाळणे, असत्य भाषण टाळणे आणि नशेपासून दूर राहणे ही पाच तत्त्वे म्हणजे धम्माच्या जीवनमार्गाचे पाच स्तंभ आहेत. पंचशील ध्वज या तत्त्वांची सतत आठवण करून देत आपल्या आचरणाला दिशा देतो.

पंचशील ध्वजाची निर्मिती : पंचशील ध्वजाची निर्मिती ही बौद्ध धम्माच्या आधुनिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. इ.स. १८८५ मध्ये श्रीलंकेतील (तत्कालीन सिलोन) कोलंबो येथे स्थापन झालेल्या एका विशेष समितीमार्फत या ध्वजाची रचना करण्यात आली. ब्रिटिश वसाहतवादी काळात बौद्ध धर्माची ओळख, प्रतीके आणि परंपरा दुर्लक्षित होत असताना, बौद्ध समाजाला एकत्र आणणाऱ्या आणि धम्माची वैश्विक ओळख दर्शवणाऱ्या प्रतीकाची गरज निर्माण झाली होती. या गरजेतून पंचशील ध्वजाचा जन्म झाला.

या समितीत पूज्य हिक्काडुवे सुमंगल थेरो (अध्यक्ष), पूज्य मिगेट्टुवत्ते गुणानंद थेरो, तसेच पाश्चात्त्य बौद्ध विचारवंत कर्नल हेन्री स्टील ऑल्कॉट, डोनाल्ड डॉन कॅरोलिस हेवाविथारणा (डॉन कॅरोलिस हेवाविथारणा), अँड्रिस बायर धर्मगुणवर्धना, चार्ल्स ए. डीसिल्वा, पीटर डी. अबेऊ, विल्यम डी. अबेऊ, विल्यम एल. फर्नांडो, एन. एस. फर्नांडो आणि कार्लिस पुजिथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर प्रकट झालेल्या सहा रंगांच्या प्रभामंडलाच्या संकल्पनेवर आधारित ध्वजाची रचना केली.

हा बौद्ध ध्वज २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमेच्या (बुद्ध जयंती) दिवशी, ब्रिटिश साम्राज्याखालील श्रीलंकेत प्रथमच सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला. पुढे कर्नल हेन्री स्टील ऑल्कॉट यांनी या ध्वजाच्या रचनेत काही प्रमाणात सुधारणा सुचविल्या, ज्यामुळे तो अधिक सुसंगत आणि सार्वत्रिक स्वरूपाचा बनला.

इ.स. १८८९ मध्ये हा सुधारित ध्वज जपानचे बौद्ध भिक्षू अंगारिका धम्मपाल (अनागारिक धम्मपाल) आणि कर्नल ऑल्कॉट यांच्या माध्यमातून म्यानमार (तत्कालीन बर्मा) येथील बौद्ध संघाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर हा ध्वज श्रीलंका, म्यानमार, थायलंड, जपान, चीन आदी देशांमध्ये बौद्ध धम्माचे प्रतीक म्हणून स्वीकारला जाऊ लागला.

अखेरीस इ.स. १९५० मध्ये भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत पंचशील ध्वजाला अधिकृतपणे “आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज” म्हणून मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पंचशील ध्वजाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि तो संपूर्ण बौद्ध जगताच्या ऐक्याचे प्रतीक ठरला.

आज पंचशील ध्वज हा केवळ ऐतिहासिक वस्तू नसून, तो शील, करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या धम्ममूल्यांचा वाहक आहे. त्याचा इतिहास हा बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा, संघटनाचा आणि जागतिक स्वीकाराचा इतिहास आहे.

ध्वजातील रंग : धम्मगुणांचे प्रतीक
या ध्वजातील प्रत्येक रंग केवळ सौंदर्य नसून धम्माचा एक गुण प्रकट करतो. निळा रंग करुणा व मैत्रीची जाणीव करून देतो; पिवळा रंग प्रज्ञा आणि मध्यम मार्गाचे स्मरण करून देतो; लाल रंग परिश्रम, वीर्य आणि साधनेचे प्रतीक आहे; पांढरा रंग चित्तशुद्धी व मुक्तीची दिशा दाखवतो; केशरी रंग त्याग, संयम आणि विरक्तीचे दर्शन घडवतो. या सर्व रंगांचे मिश्रण म्हणजे सर्व मानवजातीसाठी असलेला धम्म भेदरहित, द्वेषरहित आणि करुणामय.

पंचशील ध्वज आणि भारतीय बौद्ध चळवळ
भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्मदीक्षेनंतर पंचशील ध्वजाला विशेष सामाजिक व वैचारिक महत्त्व प्राप्त झाले. हा ध्वज केवळ धार्मिक ओळख न राहता आत्मसन्मान, समता आणि विवेकवादी क्रांतीचे प्रतीक बनला. तो सांगतो की मनुष्याची किंमत जन्मावर नव्हे, तर आचरणावर ठरते.

पंचशील ध्वजासमोर उभे राहणे म्हणजे केवळ नतमस्तक होणे नाही; तर आपल्या विचारांची, शब्दांची आणि कृतींची जबाबदारी स्वीकारणे होय. कारण धम्म हा पूजा-पाठापुरता मर्यादित नाही, तर तो जगण्याचा शास्त्र आहे. म्हणून पंचशील ध्वजाला आदर देणे म्हणजे कापडाला वंदन करणे नव्हे; तर शील, समाधी आणि प्रज्ञेला वंदन करणे आहे. ज्या दिवशी हा ध्वज आपल्या चौकातच नव्हे, तर आपल्या मनात फडकू लागेल, त्या दिवशी बुद्धांचा धम्म खऱ्या अर्थाने समाजात अवतरलेला असेल.

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिवभारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं : 9284658690

Related Articles

Back to top button
Don`t copy text!