(फलटण/ प्रतिनिधी) एकेकाळी स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना ही जागा पुन्हा शरद पवार यांनीच लढवावी, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. परंतु पवार यांनी २०१४ नंतर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे माढ्यातून लोकसभेची जागा कोणी आणि कशी लढवायची, याचा पेच कायम आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. तेव्हा माढा लोकसभा जागा लढविण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आभिजित पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, प्रमोद गायकवाड, माढ्याचे संजय पाटील घाटणेकर, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे विरोधक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील यांनी या बैठकीस हजेरी लावून शरद पवार यांच्यावर निष्ठा जाहीर केली. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढली होती. परंतु पवार यांच्याशी अकलूजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे दुरावल्यानंतर म्हणजे २००९ पासून मोहिते-पाटील यांची पक्षात अडचण वाढली होती. यातच माढा लोकसभेच्या २००९ सालच्या निवडणुकीसाठी मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची इच्छा डावलून स्वतः शरद पवार यांनाच उतरावे लागले होते.
त्यानंतर २०१४ सालच्या मोदी झंजावातात या मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीकडून स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले होते. पुढे २०१९ साली राष्ट्रवादीकडून निवृत सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे आदींनी इच्छूक म्हणून उमेदवारी पुढे आणली. यात मोहिते-पाटील यांची उमेदवारी डावलण्याचे राजकारण खेळले गेले. त्यामुळे शेवटी मोहिते-पाटील कुटुंबीयांनी राजकीय निर्णय घेत थेट भाजपमध्ये जाणे पसंत केले. तेव्हापासून माढ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्याला खिंडार पडत गेले.