(अजिंक्य आढाव/ जावली)वय वर्षे ६० च्या वरील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून २२५०रुपये इतके मानधन दिले जाते. वृध्द कलाकारांना हे मानधन वृध्दापकाळात एकमेव जगण्याचे साधन असते. असे असताना दुर्दैवाने गेली वर्षभरापासून सातारा जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गठीत न केल्याने अनेक वृध्द कलाकार वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन या योजनेपासून वंचित आहेत.
ही कलाकार मानधन समिती जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाते. सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी अनेक प्रस्ताव दाखल झाले आहेत.परंतु जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गेली अनेक महिन्यांपासून आजपर्यंत गठीत न झाल्याने अनेक दाखल प्रस्ताव प्रलंबित आहेत.सदर बाब वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी अन्यायकारक आहे.तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्यासारखे आहे.
या वृध्द कलाकारांना त्यांचे हक्काचे मानधन मिळावे किंवा ते मंजूर व्हावे यासाठी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर पालकमंत्री साहेब लवकरच कलाकार मानधन समिती गठीत करतील आणि समाज कल्याण विभागाकडे दाखल अर्जांवर योग्य ती कार्यवाही करतील असा विश्वास होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी व्यक्त केला.