(फलटण/ प्रतिनिधी)हा लोकशाहीचा उत्सव आहे. हा भारतीय संविधानाचा उत्सव आहे. मी २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू-भगिनींना आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आव्हान करत आहे. मी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये संविधान समर्थन समिती पुरस्कृत प्रहार, स्वराज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे नेते मार्गदर्शक माजी खासदार राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे आणि माझ्या संविधान समर्थन समितीचे मी मनापासून आभार मानत आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.मी माझ्या जिंकण्याची आणि पराभवाची चिंता करत नाही कारण माझा समाज माझ्या सोबत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे असे प्रतिपादन प्रा.रमेश आढाव यांनी विडणी येथील कोपरा प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले.
मी कायमच दलित चळवळीमध्ये सक्रिय राहिलो आहे. दिवंगत केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्री राम विलास पासवान यांच्याबरोबर राजकीय कामाचा माझा अनुभव आहे.पत्रकार म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, इथल्या सामान्य माणसाच्या नाही हक्काची लढाई असेल त्याला आवाज उठवण्याचं काम मी कायमच केला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात सर्व समाजातील लोकांशी माझा वैयक्तिक परिचय आहे. त्यांचं माझ्यावर अपार प्रेम आहे. तालुक्याच्या विधायक विकासाचं स्वप्न हे इतरांसारखं मीही पाहिले आहे. ते पूर्णत्वाला देण्याच्या दृष्टीने मी माझी उमेदवारी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चे प्रश्न आहेत, अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाअंतर्गत वर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्या संबंधी सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी जो निर्णय दिला तो निर्णय अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण नष्ट करण्याच्या दिशेने दिलेला निर्णय आहे असे मी मानतो. त्यांचे आरक्षण रक्षणासाठी संघर्ष करण्यासाठी मी सदैव तयार आहे. इथल्या गावगाड्यातील गरीब मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपला लढा देत आहे. त्यांनाही आरक्षण मिळावं या मताचा मी आहे.पण ते मिळत असताना ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामधून न मिळता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारने करावी अशी माझी आग्रही मागणी आहे. राज्यातील सर्व महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात समान पद्धतीने निधीची तरतूद राज्य सरकारने करावी ही माझी आग्रही मागणी राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक हे तातडीने व्हावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मधील स्मारक हेही लवकर पूर्णत्वास जावे अशी माझी इच्छा आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा.त्यांच्या शेताला वीज मिळावी. शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी व अवकाळी पावसाच्या वेळी व दुष्काळात सढळ हाताने आर्थिक मदत राज्य सरकारने करावे असे माझे मत आहे. फलटण सारख्या ठिकाणी सुसज्ज क्रीडा संकुल, स्पर्धा परीक्षा केंद्र, सर्व सेवा सुविधांनी उपयुक्त असं अद्यावत रुग्णालय, छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी बिगर व्याज कर्जपुरवठा, गाव खेड्यातील व वाड्यावर वस्त्यांवरील पाणंद रस्त्यापासून ते तालुका व जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांचं डांबरीकरण, मृदा व जलसंधारणाची कामे करून स्वच्छ सुंदर फलटण करण्याचा माझा मनोदय आहे.
माझ्यासोबत आमचे काही बांधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांनी दुसऱ्यांच्या चावी वर चालण्यापेक्षा स्वकर्तुत्वाने व स्व विचारानं येणाऱ्या काळात काम करावे. मी जिंकण्याची व हरण्याची भीती माझ्या मनात अजिबात नाही कारण माझा समाज माझ्यासोबत आहे. कोणीही व्यक्ती समाजापेक्षा मोठा नसतो. समाज हा सर्वात मोठा असतो. तो एखाद्या निष्ठावंताला वरतीही काढतो आणि समाज विघातक कृत्य करणाऱ्याला कायमचा संपवतो ही. त्यामुळे आम्ही आमच्या समाजाच्या अस्तित्वासाठी लढत आहे. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई आहे. तेव्हा येत्या २० तारखेला आपण आपल्या कुटुंबासहित मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्रावरील पाचव्या क्रमांकावर असणारी माझी निशाणी रोड रोलर याच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आपणाला नम्र विनंती करत आहे. गेली पंधरा वर्षे एकाच व्यक्तीला तुम्ही निवडून दिला आहे. त्यांनी केलेला विकास तुमच्यासमोर आहे. तेव्हा तालुक्याच्या विधायक विकासासाठी मला एकदा संधी द्या हीच मी आपणाला विनंती करत आहे.