(पुणे /प्रतिनिधी)- सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी रात्रीपासून खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. त्याचा परिणाम लगेच बाजारावर दिसून आला असून, खाद्यतेलाच्या १५ लिटर डब्याच्या दरांत अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या दरवाढीचा फटका सोसावा लागणार आहे.
केंद्र सरकारने आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी कच्चे सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेल आयातीवर ५.५ टक्के, तर रिफाइंड तेलावर १३.७५ टक्के आयात शुल्क होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त खाद्यतेलाची आवक होऊन देशातही भाव कमी झाले होते. याचा फटका देशात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनसह तेलबिया पिकांच्या भावावर झाला होता. त्यामुळे शेतकरी, प्रक्रियादार, रिफायनरीज् आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी करीत होते. आयात शुल्क वाढीने सोयाबीनच्या दराला आधार मिळणार आहे. मात्र, सणासुदीला खाद्यतेलाच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांचे दर वाढलेले होते. यातच केंद्र सरकारने २५ टक्के कर लावल्याने मोठी दरवाढ झाली आहे. केंद्र सरकारने लावलेला हा कर आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, असे व्यावसायिक प्रवीण संचेती यांनी म्हटले आहे. तर केंद्र सरकारने शनिवारी अचानक खाद्यतेलावर २५ टक्के कर जाहीर केला आहे. त्यामुळे एक लिटर खाद्यतेल शनिवारी दहा रुपयांनी महाग झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांचा प्रचंड गोंधळ झाला आहे, असे मत व्यावसायिक अनिल बुब यांनी मांडले.
शुक्रवारी रात्रीपासून तेलावरील शुल्कात २० टक्के वाढ केल्याने १५ लिटरच्या डब्यामागे २५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना पैसे मिळावेत यासाठी सरकारने ड्युटी वाढविल्याचे दिसते, असे व्यावसायिक प्रकाश पटेल म्हणाले.
खाद्यतेलाचे नाशिकमधील भाव (१५ लिटरचा डबा)
तेल १३ तारखेचा भाव आणि १४ तारखेचा भाव भाववाढ
सूर्यफूल १७०० – १९७०, २७० रुपये
सोयाबीन १६९०- १९८०, २९० रुपये